Slide 1 of 1
बैठकच नाही.... मराठा आरक्षणाबाबत आमदार रोहित पवार बोलले
अशोक बालगुडे
पुणे, दि. 24 : मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता असून, याबाबत नियुक्त केलेल्या समितीची अजून एकही बैठक झालेली नाही, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. मराठा आरक्षणावरून सरकारने कोणतेही राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पवार म्हणाले, मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी समाजाच्या हितासाठी आणि युवकांसाठी यापूर्वी खूप आंदोलने, मोर्चे काढले आहेत. त्यांचे मराठा आरक्षणावरील आंदोलन थांबवताना एका समितीची नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. समितीत मोठे अधिकारी असतील असेही सांगण्यात आले होते. मात्र, ही समिती नियुक्त झाली किंवा नाही याबद्दल माहिती नाही. समिती स्थापन झाली असेल, तर समितीची अजून एकही बैठक झालेली नाही. सरकारने नुसते बोलून चालणार नाही काही तरी ठोस निर्णय घ्यावा लागेल, असे पवार म्हणाले.
जरांगे आणि कार्यकर्त्यांचे देखील हेच मत आहे. पण, सरकार काहीच निर्णय घेत नसल्याची टीकाही पवार यांनी या वेळी केली. सर्व कार्यकर्ते या विषयावरून भावनिक असल्याने याबाबत सरकारने कसलेही राजकारण करू नये, असे आवाहनही पवार यांनी केले.
नारायण राणेंच्या आरक्षणावरून केलेल्या वक्तव्याबद्दलही रोहित पवार यांनी दुःख व्यक्त केले. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने असे वक्तव्य करणे बरोबर नाही. आम्ही ९६ कुळी कुणबी दाखला घेणार नाही, असे राणे म्हणाले होते. यावर रोहित पवार म्हणाले, एक ज्येष्ठ नेताच असे बोलत असेल, तर कसे होणार. हे योग्य नाही. यावर निश्चितपणे ठोस मार्ग काढण्याची आवश्यकता असल्याचा पवार यांनी पुनरुच्चार केला.
Tags:
Like
Comment
Share