Slide 1 of 1
बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना ठोकल्या बेड्या
एटीएसची मोठी कारवाई :
पुणे, दि. 19 ः बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून देशात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे विभागाने मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथे सोमवारी रात्री अटक केली. सुकांथा बागची (वय २१), नयन बागची (वय २२) आणि सम्राट बाला (वय २२, तिघे मूळ रा. ग्राम बहादुरपूर, दतोकन्दवा, जिल्हा मदारीपूर, बांगलादेश) असे अटक केलेल्या बांगलादेशींची नावे आहेत. त्यांच्याकडून बांगलादेशी चलन, भारतीय आधारकार्ड, पॅनकार्ड जप्त केले. तिघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय महादेव दराडे यांनी फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे सांगितले की, मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथे सह्याद्री या गृहप्रकल्पाचे काम सुरु आहे. या गृहप्रकल्पावर बिहार, उत्तरप्रदेशमधील मजूर काम करतात. त्यांच्यासोबत तीन बांगलादेशीही वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. त्याबाबत मजुरांकडे विचारणा केली असता तिघांना हिंदी भाषा येत नव्हती. चौकशी केल्यानंतर तिघे मूळ बांगलादेशी असल्याचे समोर आले. तिघेही घुसखोरी करुन भारतात आले आहेत. त्यांनी कोलकत्ता येथून नऊ महिन्यांपूर्वी बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड बनविले होते. तिघांना अटक केली आहे. सुकांथा, नयन बागची हे २३ जुलै २०२३ रोजी तर सम्राट हा ६ ऑगस्ट रोजी मोशीतील लेबर कॅम्प येथे वास्तव्यास आले होते. तिघेही मजूर म्हणून काम करत होते. त्यांच्याकडून भारतीय आधारकार्ड, पॅनकार्ड, बांगलादेशी चलन, मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत.
Tags:
Like
Comment
Share