Slide 1 of 1
पालिकेच्या तकलादू कामामुळे जीवंतपणी नरकयातना
हडपसर गाडीतळ येथील उन्नतीनगरमधील ससाणे चाळीतील प्रकार
अशोक बालगुडे
पुणे, दि. 18 ः पालिका प्रशासनाच्या तकलादू कामामुळे एक महिन्यात दुसऱ्यांदा ससाणे चाळीतील नागरिकांच्या घरामध्ये मलवाहिनीचे पाणी शिरत आहे. त्यामुळे जीवंतपणी आम्ही नरकयातना भोगत असल्याची तक्रार हडपसर गाडीतळ येथील उन्नतीनगरमधील राजेश काळंगे, वसंत भुसारे, छाया मुथ्था, महमंद अन्सारी, दिलीप पगडे, मेहबूब इनामदार यांनी केली.
काळंगे म्हणाले की, हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये मागिल महिन्यात तक्रार केल्यानंतर अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर तात्पुरते पाणी काढून निघून गेले. जुनी घरे असल्याने घरासमोर साचलेले पाणी जमिनीत मुरते आणि घरात येत असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या ठिकाणी मोठ्या आकाराची नवीन मलवाहिनी टाकून कायमचा प्रश्न सोडविण्याची गरज आहे. मात्र, प्रशासनाकडून या कामाला अद्याप मुहूर्त मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील उपअभियंता विक्रम लहाने म्हणाले की, उन्नतीनगरमधील ससाणे चाळ येथे मलवाहिनीची दुरुस्ती की नवीन वाहिनी टाकावी लागेल, याची पाहणी केली जाईल. त्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
Tags:
Like
Comment
Share