स्नेहल दगडे ः पिसोळीमध्ये (ता. हवेली) आठवडी बाजार दर शुक्रवारी सुरू
अशोक बालगुडे
पुणे, दि. 15 ः कडधान्य, दुग्धजन्य पदार्थ, सेंद्रीय पद्धतीच्या भाजीपाला, फळभाज्या थेट ग्राहकांपर्यंत देण्यासाठी आमचा शेतातून थेट तुमच्या घरात या संकल्पनेतून आठवडी बाजार सुरू केला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल आणि ग्राहकांना स्वच्छ, ताजा आणि माफक दरात शेतमाल मिळण्यास मदत होईल, असा विश्वास पिसोळी (ता. हवेली) माजी सरपंच, भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा स्नेहल दगडे यांनी व्यक्त केला.
पिसोळी (ता. हवेली) येथे स्नेहलताई गणपत दगडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरील मैदानावर विठूसाई अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लि.च्या वतीने कै. गणपतमामा दगडे यांच्या द्वितीय जयंतीनिमित्त आठवडी बाजार सुरू करण्यात आला आहे. दर शुक्रवारी दुपारी 3 ते 9 दरम्यान असणार आहे. आठवडी बाजारचे उद्घाटन भाजपचे पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते आज (शुक्रवार, दि. 15 सप्टेंबर, 2023) करण्यात आले. याप्रसंगी धनंजय कामठे, उत्तम कांबळे, सोमनाथ दगडे, मच्छिंद्र दगडे, प्रमोद दगडे, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दगडे म्हणाल्या की, उपनगरामध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणावर झाले असून, शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ, कडधान्य, अन्नधान्य थेट ग्राहकांपर्यंत देण्यासाठी विठूसाई अॅग्रो प्रोड्युसरच्या माध्यमातून सुरू केला आहे. आठवडी बाजारची वेळ दर शुक्रवारी दुपारी 3 ते 9 अशी असणार आहे. ग्राहकांना ताजा भाजीपाला मिळेल आणि शेतकऱ्यांनाही योग्य मोबदल मिळेल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जालिंदर कामठे म्हणाले की, भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांना हडपसर किंवा मार्केट यार्ड येथे जावे लागत होते. मात्र, आता आठवडी बाजार सुरू झाल्यामुळे ग्राहकांना ताजा भाजीपाला मिळेल आणि शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळेल. शेतकरी ते थेट ग्राहक आठवडी बाजार नागरिकांसाठी गरजेचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
Tags:
Like
Comment
Share